सत्ता गमावल्याचा सूड घेण्यासाठी महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे षडयंत्र! - भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर

प्रतिनिधी  कैलाश चव्हाण 
अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश लपविण्यासाठी आकांडतांडव करून त्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडण्याचा ठाकरे पितापुत्रांचा प्रयत्न हा महाराष्ट्रातील गुंतवणूक रोखण्याचा आणि नव्या गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयी संभ्रम निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न आहे, असा थेट आरोप आज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केला आहे.
वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचे ठाकरे सरकारचे अपयश उघडकीस येऊ नये यासाठी उलटा कांगावा करण्याचा प्रयत्न पुरता फसल्यानंतर आता महाराष्ट्राशी कोणताच संबंध नसलेल्या उद्योगांची खोटी यादी पुढे करून जनतेच्या मनात संशय निर्माण करण्याचे उद्योग ठाकरे पितापुत्रांनी सुरू केले आहेत. प्रत्यक्षात ज्या उद्योगांशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे यांनी साधी चर्चादेखील केली नव्हती, सामंजस्य करारही झाला नव्हता, किंवा सरकारमार्फत कोणताही पत्रव्यवहारदेखील झाला नव्हता, अशा उद्योगांची खोटी यादी पुढे करून एक अपप्रचाराचे टुलकिट तयार करण्याचा या पितापुत्रांचा प्रयत्न महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रगतीस आणि उद्योगस्नेही वातावरणास अडसर निर्माण करणाराच आहे असा गंभीर आरोपही राहुल लोणीकर यांनी केला.

अविश्वासाने आणि जनादेश लाथाडून अभद्र आघाडीद्वारे गैरमार्गाने मिळविलेली सत्ता अडीच वर्षांत गमावल्याच्या संतापातून ठाकरे पितापुत्रांचा हा थयथयाट सुरू असून, याचा सूड महाराष्ट्रावर उगवण्यासाठी राज्यातील गुंतवणुकीत अडसर उभे करण्याचा भयंकर कट रचला जात आहे, असा संशय देखील राहुल लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला.

महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. कोविड काळात ठाकरे सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे अनेक नमुने जनतेने प्रत्यक्ष अनुभवले आहेत. जुलमी, एककल्ली, हेकेखोर, आणि कायदा गुंडाळून ठेवत जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेऊन काँग्रेसी राजवटीत नेले. मात्र, आता अशा कटकारस्थानांना केराची टोपली दाखवून राज्याला वेठीस धरणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल असा इशाराही राहुल लोणीकर यांनी दिला. 

ठाकरे सरकारशी संबंधित असलेल्यांच्या भ्रष्टाचाराचे भयंकर नमुने आता उजेडात येऊ लागले आहेत. भ्रष्टाचाराच्या आणि देशद्रोह्यांना साह्य केल्याच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खावी लागलेल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून आणखी काही बोलभांड नेत्यांना गजाआड जाण्याच्या भीतीने घाम फुटला असून त्या भीतीपोटीच हे आकांडतांडव सुरू असल्याचा टोला देखील राहुल लोणीकर यांनी लगावला आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार