परतूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जागतिक वन दिन उत्साहात साजरा.,वने जगली तरच जीव सृष्टी जगेल ! ------ डाॅ. भगवान दिरंगे


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
भारतीय संस्कृती ही अरण्य संस्कृती आहे. प्राचीन काळापासून भारतीय समाजात वनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.परंतु अलिकडच्या काळात वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होत असल्यामुळे मानवासह संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे यांनी केले.
ते परतूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जागतिक वन दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.तायडे हे होते. व्यासपीठावर वन परिक्षेत्र अधिकारी मनिषा मगरदे, वनपाल डी.जी.राठोड,अर्चना चंद्रमोरे,सूर्यकांत बुरांडे आदी मंडळी उपस्थित होती.
        आपले मनोगत व्यक्त करताना डाॅ.दिरंगे पुढे म्हणाले की, मानवाला जगण्यासाठी शुद्ध हवा, पाणी आणि अन्न वनांमुळे मिळते. सध्या जग जागतिक तपमान वाढीच्या संकटात सापडले आहे. त्यामुळे भीषण अशी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. पिण्यासाठी, शेतीसाठी , आणि उद्योग धंद्यासाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कधी अवर्षन तर कधी अतीवृष्टी असे असंतुलन पर्यावरणात निर्माण झाले आहे.केवळ वृक्षतोड आणि प्रदूषणाचा हा दुष्परिणाम आहे.यावर वनसंवर्धन व वनरक्षण हाच एकमेव पर्याय आहे. एक झाड दररोज 230 लिटर ऑक्सीजन देते. माणसाला जगण्यासाठी 550 लिटर ऑक्सीजनची गरज आहे. तेव्हा प्रत्येक माणसाने किमान तीन झाडे लावणे आणि जगविणे आवश्यक आहे.अशीही माहिती त्यांनी शेवटी आपल्या भाषणात दिली.
        वन परिक्षेत्र अधिकारी मनिषा मगरदे यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की , सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे कार्य प्राधान्याने केले जाते. समाजातील व्यक्ती व संस्थांना वृक्ष लागवडीसाठी वनीकरण विभाग संपूर्ण सहकार्य करतो. रोप देण्यापासून , वृक्ष जोपासण्यासाठी सहकार्य केल्या जाते. वनरक्षण आणि वन संवर्धनाचे कार्य हे लोक चळवळीत रूपांतरीत व्हायला पाहिजे. मनुष्यजातीसह इतर जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी हे आवश्यक आहे.
     या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.तायडे यांनीही आपले विचार मांडले. या प्रसंगी हरिभाऊ मोगल,अमित जवळेकर, वर्षा पवार,आर्यन अंभुरे,बाबासाहेब बिडवे,अशोक कानडे,शाम बरकुले,विलास काकडे,भिकाजी चिंचाणे,रामेश्वर गायकवाड,सुरेश शिंदे,विष्णू चव्हाण, राजेश शिंदे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटीकरण दिगंबर लिपणे यांनी केले.

Comments