मंठा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त भव्य हिंदू संमेलन; एकतेचा, स्वदेशीचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेशभव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले; प्रमुख वक्ते संजय राव तालखेडकर यांचे प्रभावी मार्गदर्शन




मंठा प्रतिनिधी रवी पाटील 
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मंठा शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने शहरात आकर्षक व उत्साहपूर्ण शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून एकात्मतेचे दर्शन घडवले.
संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून संजय राव तालखेडकर यांनी मार्गदर्शन करताना हिंदू संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि सध्याच्या काळातील जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या. “हिंदू संस्कृती ही अनादिकालापासून टिकून राहिलेली असून सततच्या आक्रमणांनंतरही ती अधिक सक्षम झाली आहे. जगाला शांततेचा संदेश देण्याचा अधिकार हिंदू समाजालाच आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात हिंदू समाजाने जाती-पातीच्या भिंती ओलांडून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे.” स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांनी केलेली भविष्यवाणी आज साकार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

परमेश्वरप्राप्तीचा अधिकार सर्वांना समान आहे, ही हिंदू धर्माची मोठी देणगी असल्याचे सांगत त्यांनी संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. “जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातून समाज एकसंघ ठेवण्याचा संदेश मिळतो. भेदभाव दूर करून समाज एकत्र राहणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या संमेलनातून संघाच्या वतीने पंचसूत्री अभियानाचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देत त्यांनी सांगितले की, “वाढते प्रदूषण आणि प्लास्टिकचा अतिरेक यासाठी आपणच जबाबदार आहोत. प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळून किमान एक वृक्ष लावण्याचा संकल्प करावा.”

कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व सांगताना त्यांनी नमूद केले की, “भारतीय कुटुंब व्यवस्था ही आदर्शवत आहे. मात्र आधुनिक जीवनशैलीत ती दुर्बल होत आहे. आठवड्यातून किमान एकदा कुटुंबाने एकत्र येऊन जेवण, भजन-कीर्तन किंवा देवदर्शन करणे आवश्यक आहे. यामुळे संस्कार बळकट होतील.”
स्वदेशीचा पुरस्कार करत त्यांनी सांगितले की, “आपण आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना परदेशी वस्तूंचे आकर्षण टाळणे गरजेचे आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर केल्यास देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल.”
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी हिंदू समाजाने अभिमानाने एकत्र येऊन राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले. संमेलनामुळे मंठा शहरात उत्साहाचे व एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात