धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.


जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत
संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्यामुळे संकटाचे रूपांतर विजयात झाले. अढळ श्रद्धा, दृढनिश्चय आणि शुद्ध आचरण असलेल्या व्यक्तीला परमात्म्याची कृपा निश्चितच लाभते, असा संदेश त्यांनी या प्रसंगातून दिला.

महासती निर्मलाजी म.सा. म्हणाल्या की, वासना आणि अहंकाराच्या आहारी गेलेला मनुष्य मदमस्त हत्तीप्रमाणे स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत ठरतो. म्हणून मन, वचन आणि काया यांवर संयम ठेवणे हीच खरी साधना आहे. बाह्य शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःच्या विकारांवर विजय मिळवणे अधिक महत्त्वाचे असून त्यातूनच आत्मशांती आणि आत्मोन्नतीचा मार्ग खुला होतो.

त्या पुढे म्हणाल्या की, क्षमा ही दुर्बलतेचे नव्हे तर अंतःकरणाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. अन्याय करणाऱ्याविषयीही द्वेष न बाळगता समता, करुणा आणि सद्भावनेचा स्वीकार करणारा व्यक्तीच धर्माचे खरे पालन करतो. समाजात शांतता, बंधुभाव आणि सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने या मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे.

प्रवचनाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांना सत्य, अहिंसा, संयम, सदाचार आणि गुरूंच्या शिकवणीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. शरीर, संपत्ती, मान-सन्मान आणि वैभव हे क्षणभंगुर असले तरी धर्माने कमावलेले संस्कार, सद्गुण आणि शुभकर्म हेच जीवाचे खरे वैभव असून त्यातूनच आत्मकल्याण आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रशस्त होतो, असे त्यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत