परमार्थात कष्ट करा; परमात्म्याचा पैसा घेऊ नका – ह.भ.प. राजेंद्र महाराज चोरडीया ,तळणी येथे तीन दिवसीय कीर्तन सोहळ्यात काल्याच्या कीर्तनातून परखड उपदेश


तळणी प्रतिनीधी रवि पाटील 
 परमार्थ क्षेत्रात काम करा, कष्ट करा, धंदा–व्यवसाय, दुकानदारी करा; पण पोटासाठी श्रम करताना परमात्म्याचा पैसा घेऊ नका, असा परखड आणि अंतर्मुख करणारा उपदेश ह.भ.प. राजेंद्र महाराज चोरडीया यांनी दिला. तळणी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरात आयोजित तीन दिवसीय कीर्तन सोहळ्याच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी त्यांनी आजच्या वारकरी संप्रदायातील प्रवृत्तीवर चिंतन मांडले.
आज वारकरी, टाळकरी ते कीर्तनकारांपर्यंत परमार्थाच्या नावाखाली परमात्म्याचा पैसा घेतला जातो; हे कोणाच्या ध्यानात आहे का, कोणी यावर बोलत आहे का? असा प्रश्न उपस्थित करत, निष्काम कर्म केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही, असे महाराजांनी स्पष्ट केले. निष्काम भावाने सेवा केली, तरच मन शुद्ध होते आणि जीवन मुक्तीकडे वाटचाल होते, असे त्यांनी सांगितले.
सावध सेवा आणि अपेक्षाहीन भक्तीच प्रगतीचा मार्ग
जीवाचे कर्तव्य आहे की सावध राहून परमार्थ करावा, सावध राहून देवाची सेवा करावी आणि अपेक्षाहीन भावाने सेवा करावी. जोपर्यंत अपेक्षाहीन सेवा केली जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रगती होत नाही, असे महाराज म्हणाले. परमार्थात भगवंतांची सेवा केल्याशिवाय संतकृपा प्राप्त होत नाही आणि संतभेटीशिवाय खरे सुख मिळत नाही. म्हणून सेवेचा व्रत घ्या, असा संदेश त्यांनी दिला.
घराघरांत संस्कार जपण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक घरात तुळशीची पवित्र माळ असावी, नित्यनियमाने देवपूजा करावी, देवाचा गंध लावावा. हे संस्कार घरातूनच मिळाले पाहिजेत; तेच जीवनाला दिशा देतात.

मनुष्याला आपला विसर झाला पाहिजे आपला विसर कधी होऊ शकतो जसे आपण पती-पत्नीचा विसर विसरू शकत नाही कारण पतीने सर्वस्व आपल्याला दिलेले असते तसेच आपले सर्वस्व आपण भगवंताला दिले पाहिजे तरच आपल्याला आपला विसर होईल येथे फक्त मी आणि माझे एवढेच चालू आहे . जोपर्यंत हा विचार मनुष्यात राहील तोपर्यंत मनुष्याला अवस्था प्राप्त होणार नाही आणि परमार्थ केल्याचे फलही प्राप्त होणार नाही मनुष्याची अशी धारण आहे की कसा जरी परमार्थ केला तर वाया जाणार नाही परंतु एखाद्या भाजीमध्ये जर आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ टाकले तर ती भाजी खाण्यायोग्य राहील का भाजीत टाकलेल मोगम मीठ जर मनुष्याला चालत नाही तर मोघम केलेला परमार्थ देवाला कसा चालेल व तो परमार्थ मनुष्याला साधक अवस्थेत कसा नेईल 
धर्माचे आचरण करा धर्माचे पालन करा तरच आपले अस्तित्व या पृथ्वीतलावर टिकून राहील संस्कार कलियुगातला सर्वात मोठा दागिना असून तू संस्कार आपल्याबरोबरच इतरांनाही देण्याचा मनातून प्रयत्न करा आपली संस्कृती ही महान आहे सनातन धर्माचा आदर करा असेही महाराजांनी यावेळी स्पष्ट केले

मनुष्याच्या आयुष्यात प्रमाण आवश्यक आहे वर्म आवश्यक आहे याच विचाराने आपल्या आयुष्यात संत विचाराचा वर्म असणे आवश्यक आहे संतांनी आपल्याला अनेक मार्गदर्शक तत्व दिले आहेत त्या तत्त्वावर आज मनुष्य चालला तर त्याचा नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही मनुष्याच्या आयुष्यात परमार्थिक साधनेला खूप महत्त्व आहे ती साधना निस्वार्थ झाली पाहिजे कुठलीही फळाची अपेक्षा न करता केलेली साधना हीच देवाला प्रिय असते त्या साधनेचा विचार जर आपण केला तर आजचा काला आपल्या सर्वांसाठी सार्थकी झाला असे मानायला हरकत नाही

अभंगातून भक्तीची तल्लीनता उलगडली
संत तुकाराम महाराजांच्या “कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥” या अभंगावर सखोल विवेचन करताना महाराजांनी गौळणीच्या कथेतून भक्तीची तल्लीनता उलगडली. बाजारात दूध विकताना ‘दूध घ्या’ म्हणण्याऐवजी ‘हरी घ्या’ म्हणणारी गौळण हरिच्या लावण्यरूपात इतकी गुंग झाली होती की तिला स्वतःच्या स्थितीचाही विसर पडला. अभक्त लोक तिची थट्टा करत होते; पण तिचे कान त्यांच्या हशाकडे नव्हते—ती गोविंदाच्या गुण–रूपात एकरूप झाली होती, असे महाराजांनी भावपूर्ण शैलीत सांगितले.

गायपालन म्हणजे कृष्णभक्ती
गाय पाळणे म्हणजे कृष्णाची भक्ती आहे, असे सांगत महाराजांनी गोसेवेचे महत्त्वही अधोरेखित केले. जीवन सावधपणे जगा; संतांनी दिलेल्या न्यायाने थोडेसे वागले तरी कल्याण निश्चित आहे. हे आचरणात आणले, तर याच देहात जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कीर्तन सोहळ्याला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंतर्मुख करणाऱ्या उपदेशाने उपस्थितांमध्ये भक्तिभाव आणि आत्मचिंतनाची भावना निर्माण झाली

श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिराच्या दहाव्या वर्षाच्या निमित्ताने या तीन दिवशी सप्ताहाचे आयोजन जनकवार परिवाराकडून करण्यात आले होते लगेच या सप्ताहाचे सुद्धा महाराजांनी कौतुक केले

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात