सिंगोना येथील मयत पांडुरंग कदम यांच्या वारसाला एसबीआय बँकेकडून ४० लाखांचा विमा धनादेश सुपूर्द,दोन हजार रुपयांच्या पॉलिसीने कुटुंबाला दिला आर्थिक आधार
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा
तालुक्यातील सिंगोना येथील रहिवासी पांडुरंग अंजीराम कदम (वय ४२) यांचे गतवर्षी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सिंगोना पाटीवर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्यांनी भारतीय स्टेट बँकेची (एसबीआय) अवघ्या दोन हजार रुपयांचा प्रिमियम भरून जनरल इन्शुरन्स अपघाती विमा पॉलिसी काढली होती. त्यांच्या या अपघाती निधनानंतर बँकेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अत्यंत तत्परतेने त्यांच्या वारसाला तब्बल चाळीस लाख रुपयांचा अपघाती विमा मंजूर केला.
या मंजूर विमा रक्कमेचा चाळीस लाख रुपयांचा धनादेश मयत पांडुरंग कदम यांच्या वारसदार पत्नी शिला पांडुरंग कदम यांना १० जून २०२६ रोजी परतूर येथील 'एसबीआय' मुख्य शाखेत मुख्य शाखा व्यवस्थापकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुटुंबाचा मुख्य आधार हरपलेल्या कदम कुटुंबाला या कठीण काळात बँकेच्या दोन हजार रुपयांच्या पॉलिसीमुळे चाळीस लाख रुपयांचे मोठे आर्थिक छत्र लाभले आहे. या विमा रक्कम धनादेश वितरणप्रसंगी बँकेचे शाखा प्रबंधक विजय राम, उपप्रबंधक हर्षवर्धन मुन, संध्या रसाळ, प्रज्वल सावंत, योगेश धानुरे, आकाश राजनकर, अशय नानवटकर, वैष्णवी क्षीरसागर, शिवाजी कुलकर्णी, मुलगा सहदेव कदम, भाऊ विठ्ठल कदम,भरत सुरुंग यांच्यासह बँक कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक नागरिकाने व बँकेच्या ग्राहकांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील सुरक्षेसाठी अशा विमा योजनांचा लाभ घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन यावेळी बँक प्रशासनाच्या वतीने मुख्य शाखा व्यवस्थापक विजय राम यांनी केले आहे.
Comments
Post a Comment